कोळी बांधवांचे अर्थचक्र बिघडले, ‘या’ दोन नदीपात्रातील फळांची शेती कालबाह्य

0

तुमसर येथील बावनथडी, वैनगंगा या नदी पात्रात यापूर्वी उन्हाळ्यच्या दिवसात टरबूज, काकड्या, डांगरे व भाजीचे उत्पादन घेतले जात होते, परंतु गेल्या काही वर्षांपासून या नद्या वर धरण बांधल्याने नदीपात्र कोरडे पडत आहे. त्यामळे  कोळी बांधवांचे अर्थचक्र बिघडले आहे.

डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत त्यांचा हा पर्यायी व्यवसाय होता. शहरात व ग्रामीण भागात या फळांना व भाज्यांना मोठ्या प्रमाणत मागणी देखील होती.  येथील जमीन कसदार व गाळाची असल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. शहरांमध्ये त्यांना मोठी मागणी होती. पाच ते सहा महिने कोळी बांधवांनी येथे शेती करून भरघोस उत्पन्न घेतले परंतु आता ते कालबाह्य झालेले दिसून येत आहे.

वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे बंधारा तयार करण्यात आला तर भवानवाडी या नदीवर धरण बांधण्यात आले. धरणाच्या अलीकडे बॅकवॉटर असल्यामुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात उबलब्ध आहे. दुसरीकडे नदीपात्र नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच कोरडे पडलेले आहे. अनेक ठिकाणी या नद्यांच्या प्रवाहही बंद झालेला आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी राहत नाही. टरबूज, काकड्या व इतर भाज्यांना पाण्याची गरज असते. पाणीच नसल्यामुळे कोळी बांधवांना या नैसर्गिक शेतीपासून मुकावे लागले आहे. आता त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने त्यांच्याकरिता पर्यायी व्यवस्थाही केलेली नाही, त्यामुळे त्यांचे अर्थचक्र बिघडलेले आहे.

Leave a comment