शेतकऱ्यांना दिलासा, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली
देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र आता केंद्राने मोठा निर्णयात कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
1 जानेवारी 2021 पासून कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या वर्षापासून सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी रद्द करण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या परदेश व्यापारी महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना सोमवारी जारी केली. सरकारचा हा निर्णय म्हणजे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Government of India allows export of all varieties of onions with effect from 1st January 2021 pic.twitter.com/8yMPwVnui5
— ANI (@ANI) December 28, 2020
सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासोबतच कांदा साठवणुकीबाबत देखील काही अटी घातल्या होत्या. 14 सप्टेंबरला कांद्यावर निर्यातबंदी घातली होती. त्यानंतर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात आला होता.
पुरेसा कांदा बाजारात आला असून, त्याचे भावही खाली आहेत. केंद्राने कांद्यावरी निर्यात बंदी हटवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
याच बरोबर ‘बेंगलोर रोज’ आणि ‘कृष्णपुरम कांदा’ यांच्या निर्यातीवरील बंदीदेखील 1 जानेवारीपासून उठणार आहे. या कांद्यांवर सरकारने 9 ऑक्टोबर 2020 रोजी बंदी घातली होती.
यापूर्वी सप्टेंबर 2019मध्येही केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यावेळी मागणी आणि पुरवठा यांत मोठी दरी निर्माण झाल्याने कांद्याच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रासारख्या प्रमुख्य कांदा उत्पादक राज्यात पाऊस आणि पुरामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते.