हरभरा पिकाची तंत्रशुद्ध लागवड

0

हरभरा हे रबी हंगामातील सर्वात महत्वाचे कडधान्य पिक आहे. खरिपातील मुग व उडिद या कमी कालावधीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर कोरडवाहू परिस्थितीत अथवा संरक्षीत ओलीताची सोय असल्यास हरभऱ्याची लागवड केली जाते. तसेच सोयाबिनची काढणी झाल्यानंतर ओलीताखाली हरभऱ्याची लागवड केल्या जाते.

कोरडवाहू तसेच ओलीताखालील हरभऱ्यासाठी विजय, दिग्वीजय, राजविजय, जाकी,डॉलर, साकी, हिरवा चाफा, पीकेव्ही हरीता, आयसीसीव्ही-10 या देशी (सुधारीत) वाणांची शिफारस करण्यात आली आहे. याकरिता वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोंबरचादुसरा आठवडा तर संरक्षित ओलीताची सोय असल्यास दहा नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची
पेरणी करता येते. अपवादात्मक स्थितीत काही ठिकाणी शेतकरी डिसेंबर अखेरपर्यंत सुध्दा ओलिताखालील हरभऱ्याची पेरणी करतांना आढळतात.

कोरडवाहू तसेच ओलीताखालील काबुली हरभऱ्यासाठी विराट, आयसीसीव्ही-2, पीकेव्ही काक-2, पिकेव्ही काबुली-4 या टपोऱ्या दाण्यांच्या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. याकरिता वेळेवर पेरणीसाठी ऑक्टोबरचा दुसरा पंधरवाडा तर शिरा पेरणीसाठी संरक्षित ओलिताची सोय असल्यास दहा नोव्हेंबर पर्यंत पेरणी
करता येते.

देशी (सुधारीत) हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर 30 सें.मी. x 10 सें.मी. एवढे राखावे याकरिता बियाण्याच्या आकारानुसार एकरी 30-40 किलो बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा. याद्वारे एकरी दिड लाख पर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते.

काबुली हरभरा वाणांसाठी पेरणीचे अंतर 45 सें.मी. x 10 सें.मी.एवढे राखावे.याकरिता बियाण्याच्या आकारानुसार एकरी 40-50 किलो बियाण्याचा वापर

पेरणीसाठी करावा. याद्वारे एकरी एक लाखपर्यंत झाडांची संख्या राखण्यास मदत होते.

देशी (सुधारीत) तसेच काबुली हरभऱ्याच्या पेरणीसाठी सुधारित पेरणीपद्धतींचा वापर खालील प्रमाणे करता येईल.

बीबीएफ प्लँटरच्या सहाय्याने पेरणी – सोयाबिन पिकाच्या पेरणीसाठी वापरले जाणारे बीबीएफ प्लँटर हरभऱ्याच्या पेरणीसाठी सुध्दा वापरता येते. याद्वारे पेरणी करतांनाच प्रत्येक 4 ओळीनंतर दोन्ही बाजुला सऱ्या पाडल्या जातात. त्यामुळे तुषारसंचाद्वारे तसेच सरीद्वारे सुद्धा पाणी देणे सोईचे होते. यामध्ये प्रत्येक पाचवी ओळ खाली राखल्यामुळे बियाण्याचे प्रमाण 20 टक्के कमी लागते.

पट्टापेरपद्धतीने पेरणी – सोयाबिन पिकासाठी ज्याप्रमाणे पट्टापेर पद्धतीचा अवलंब उपयोगी सिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्यात सुद्धा हा प्रयोग अत्यंत उपयुक्त सिद्ध झाला आहे. हरभरा पेरणीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्र सहा दात्यांचे असते. अशाप्रकारे पेरणी करतांना प्रत्येक वेळी पलटून येतांना व जातांना सातवी ओळ खाली ठेवावी. याद्वारे शेतात सहा – सहा ओळीच्या पट्टयात पेरणी होते. यामध्ये प्रत्येक सातवी ओळ खाली राखल्यामुळे बियाण्याचे प्रमाण साधारणत: 15 टक्के कमी लागेल.

ट्रॅक्टरचलीत सहा दात्याच्या पेरणी यंत्राचे दोन्ही काठावरील प्रत्येकी एक छीद्र बोळा कोंबून बंद करावे. म्हणजे पेरणीच्या वेळी आपोआपच काठावरच्या ओळी खाली राहतील. पलटुन येतांना व जातांना खाली ठेवलेल्या ओळीतच शेवटचे दाते ठेवावे म्हणजे आपोआपच प्रत्येक चार ओळीनंतर एक ओळ खाली राखल्या जाऊन
त्याठिकाणी हलकी सरी तयार होते.

पट्टापेर पध्दतीने पेरणी केलेली असल्यास डवऱ्याच्या जाणोळ्याला दोरी गुंडाळून,केवळ खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी दांड अथवा सरी अथवा गाळ पाडुन द्यावे.

बीबीएफ प्लँटरने अथवा ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्राने पट्टापेर पद्धतीच्या अवलंबातुन फवारणीसाठी योग्य जागा उपलब्ध होते, ओलीताची सोय असल्यास सरीद्वारे पाणी देता येते, तुषारसंच असल्यास पाईप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होते, पिकाची निगराणी निरिक्षण यासाठी जागा उपलब्ध होते, शेतात हवा खेळती राहते,सुर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग पिकाला होतो, पिकाची अवास्तव वाढ होत नाही. बियाण्याच्या प्रमाणात 15-20 टक्केपर्यंत बचत तसेच बियाणे खर्चात सुध्दा बचत शक्य होते, यासारखे फायदे आपोआपच मिळतात.

हरभरा पिकाच्या कमी उत्पादनासाठी कारणीभुत बाबी –

कमी उगवण:- योग्य खोलीवर अथवा ओलाव्यात बियाणे न पडल्यास कमी उगवणीचा धोका संभवतो.

 रोपांची कतरण :- भुईकिडा (काळीम्हैस) या किडीचा उगवणीपश्चात लगेच प्रादुर्भाव होतो. आदल्यावर्षी हरभरा पिकात कतरणचा प्रादुर्भाव झालेला असल्यास पुढील वर्षी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असते.

रोपांची मर : उगवणी पच्छात लगेचच, पिक 12-15 पानावर (पेरणीपासुन 15-17 दिवस ) असतांनापासूनच मर या बुरशीजन्य रोगाची सुरूवात होते. रोपे लहान असल्यामुळे मर रोग आल्याचे पटकन लक्षात येत नाही.

पिकाची अतिरिक्त वाढ :- पिकाची उंची अकारण वाढल्यास फांद्यांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट संभवते. अवेळी ओलीत अथवा ओलीताचा असमतोल झाल्यास अथवा उभ्या पिकात युरियाचा अवाजवी वापर
केल्यास पिकाची अवास्तव वाढ संभवते.

घाटेअळीचा प्रादुर्भाव :- घाट्यामध्ये दाणे भरतांना घाटेअळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतांना दिसून येतो. यामुळे हरभरा पिकाला मोठे नुकसान होतांना आढळते.

खरगे पडणे :- घाट्यांमधील दाणे पक्व होतांना बुरशीजन्य मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतात खरगे पडल्याचे दिसून येते.

हरभऱ्याच्या उत्पादनवाढीसाठी उपाययोजना –

हरभऱ्याच्या कमी उत्पादनासाठी कारणीभुत वरील बाबींसाठी योग्य उपाय योजना केल्यास उत्पादनात शाश्वत वाढ शक्य होते.
पेरणीच्या आदल्या दिवशी बियाणे तिन ते चार तास पाण्यामध्ये भिजवावे.बियाणे हवेशीर ठिकाणी ताडपत्रीवर पातळ थरात पसरवुन रात्रभर बियाणे सुकु द्यावे वदुसऱ्यादिवशी सकाळी पेरणीसाठी वापरावे. याद्वारे कमी उगवणीचा धोका टाळता येतो तसेच उगवण लवकर व एकसारखी होण्यास मदत होते.

पेरणीपुर्वी बियाण्याला रायझोबियम सायसरी, पीएसबी व टायकोडर्मा कल्चरची बीज प्रक्रिया करावी. आदल्या दिवशी भिजवुन सुकविलेल्या प्रति किलो बियाण्याला 5 मीलीरायझोबियम, 5 मीली पीएसबी व 3-5 मीली ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत अर्धातास वाळवून पेरणी करावी. जिवाणू संघाचा वापर करावयाचा झाल्यास 10 मीली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी.

उशिरा पेरणीच्या अवस्थेत ओलीताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे जमीन ओली करून घ्यावी व वाफसा आल्यावर पेरणी बीबीएफ प्लँटर अथवा ट्रॅक्टरचलीत पेरणीयंत्राने पट्टापेर पद्धतीने करावी. उगवण झाल्यानंतर पुन्हा हलके ओलीत द्यावे.

याकरिता तुषार संचाचा वापर करावयाचा असल्यास पाण्याची सिप (तुषार सिंचनसंच चालु ठेवण्याचा कालावधी) तीन-चार तासांदरम्यान, जमीनच्या प्रकारानुसार राखावी. हलक्या मध्यम जमिनीसाठी चार तास, मध्यम भारी जमिनीसाठी तीन तास तसेच भारी ते अतिभारी जमिनीसाठी दोन तास या प्रमाणे तुषारसंचाद्वारे पाण्याची सिप राखता येते. यासाठी जमिनीतील ओलीचा अंदाज घेवून परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा.

पेरणीच्या वेळी साधारणत: 100 किलो चांगले कुजलेले शेणखत + दिड बॅग डीएपी + अर्धा बॅग एमओपी + दहा किलो झिंक सल्फेट + 5 किलो फेरस सल्फेट या प्रमाणे योग्य प्रकारे मिसळुन पेरणीसोबत पेरणी यंत्राद्वारे द्यावे.

आदल्या वर्षी हरभऱ्याच्या शेतात कतरणचा (भुईकिडा / काळी म्हैस) प्रादुर्भाव झालेला असल्यास उगवणीपश्चात ताबडतोब जमिनीवर किटकनाशक जसे क्लोरोपायरीफॉस अथवा क्वीनॉलफॉस तसेच बुरशीनाशक जसे कॉपर ऑक्सीक्लोराईड अथवा ब्ल्यु कॉपर यांची एकत्रीत फवारणी करावी. म्हणजेच सुरुवातीलाच हरभरा पिकावर उगवन पश्चात लगेचच येणाऱ्या मर रोगाची रोकथाम करता येते.

पिकांची अतिरिक्त वाढ टाळण्याच्या दृष्टीने निंदणाच्यावेळी शेंडे खुडुन घ्यावे. याद्वारे पिकाची अवास्तव वाढ टाळता येऊन फांद्याच्या संख्येत वाढ होऊन उत्पादनात वाढ शक्य होते. यासाठी शेंडे खुडणी यंत्राचा वापर सुध्दा मजुरीखर्चात बचत करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो.

हरभऱ्याच्या पिकासोबत सुरूवातीचे 45 दिवस तणांची स्पर्धा तिव्र असते त्यामुळे निंदणीच्या माध्यमातुन तणे व पिक यांच्यामधील स्पर्धा कमीत कमी राखण्याच्या दृष्टीने या दरम्यान पिक तणमुक्त राखावे. हरभरा पिकासाठी उभ्यापिकात रुंद पानाच्या तणांच्या बंदोबस्तासाठी फवारण्यासाठी निवडक तणनाशक उपलब्ध नाहीत, त्यामुळे तणनाशकाचा वापर करु नये. ओलीताचा हरभरा असल्यास पेरणी ओलीत

करुन करावी व पेरणीनंतर परंतू उगवणीपुर्वी (पेरणीपासुन 48 तासांच्या आत) पेंडामेथिलीन या तणनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात 50-70 मीली या प्रमाणे करावी. यावेळी जमिनीच्या पृष्ठभागात ओल असणे अत्यंत गरजेचे असते.

पिक कळ्या सुटण्याच्या अवस्थेत येतांना हलके संरक्षित ओलीत द्यावे. तुषारसिंचन संचाद्वारे ओलीत करतांना सिप 2-3 तासांनी बंद करावी. जेणेकरून जमीनीत ओल 7- 8 सेमी खोलीपर्यंत पोहोचेल. यानंतरचे संरक्षित ओलीत वरिल प्रमाणेच आवश्यकतेनुसार घाट्यांमध्ये दाणे भरतांना द्यावे. हरभऱ्याचे पिक मर या बुरशीजन्य रोगास अत्यंत संवेदनशिल आहे. त्यामुळे शेतात पिकाच्या बुडाशी पावसाचे पाणी साचणार नाही अथवा संरक्षीत ओलीत देतांना पाणी अतिरिक्त प्रमाणात दिल्या जाणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी, यामुळेच बीबीएफ प्लँटरने अथवा पट्टापेर
पद्धतीने पेरणी केलेली असल्यास अतिरिक्त पाणी सरी मध्ये जमा होऊन बुरशीजन्य मर रोगाचा पिकास कमीत कमी धोका संभवतो.

पिक कळी अवस्थेत येतांना शेंडे खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भावाची सुरवात लक्षात घेता किटकनाशक जसे क्लोरोपायरीफॉस (20 मीली) अथवा क्विनॉलफॉस (20 मीली). तसेच मर रोगासाठी बुरशीनाशक जसे एम-45 (25 ग्रॅम) अथवा कार्बेनडॅझिम (10 ग्रॅम) + एक टक्के युरियाची (100 ग्रॅम) फवारणी प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे
करावे.

हरभऱ्याचे पिक घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत येतांनो वरिलप्रमाणेच किटकनाशक + बुरशीनाशक + 13:00:45 – 0.5 टक्के ( 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) या विद्राव्य खताची फवारणी आवश्यकतेनुसार करावी. घाटे व पाने पिवळी पडण्यास सुरूवात झाल्यानंतर ओलीत करू नये, याप्रमाणे हरभरा पिकाच्या समस्यांवर आधारित तंत्रशुद्ध लागवड व्यवस्थापन शेतकरी बांधव करू शकल्यास उत्पादकतेत शाश्वत वाढ शक्य होते. पिकाच्या गरजेवर आधारीत आवश्यकतेनुसार निविष्ठांचा वापर केल्यास निविष्ठा खर्चात तसेच मजुरी खर्चात निश्चित बचत करता येते. अशाप्रकारे हरभरा पिकाच्या लागवड खर्चात बचत शक्य झाल्यास मिळालेल्या उत्पादनानुसार शेतकऱ्याला मिळणारा नफा व त्यानुसार होणारा फायदा यामध्ये सुध्दा शाश्वत वाढ होतांना दिसून येते.

प्रा. जितेंद्र दुर्गे
सहयोगी प्राध्यापक (कृषि विद्या)
श्री शिवाजी कृषि महाविद्यालय,

अमरावती
मो.नं. 9403306067
प्रा.डॉ. लिना शिंदे
सहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या)
पी.आर. पोटे पाटील कृषि महाविद्यालय,अमरावती

Leave a comment