चंदन लागवड पद्धत
चंदनाची मूलभूत माहिती
वनस्पती शास्त्रीय भाषेत भारतीय चंदन प्रजातीला सॅन्टलम अल्बम (Santalum Album) नावाने ओळखले जाते. तशा एकूण जागतिक स्थरावर चंदनाच्या ५६ जाती आहेत त्यापैकी १६ जाती प्रसिद्ध पावल्या आहेत .
व्यावसायिक बाजार पेठेत सॅन्टलम अल्बमला “पूर्व भारतीय चंदन” नावानेही ओळखले जाते. भारतीय संस्कृतीत चंदनाची गुंफणूक इतकी बेमालूम पद्धतीने झाली कि प्रत्येक धार्मिक कार्यात तिचे अनन्यसाधारण महत्व झाले आहे त्याचे अनेक दाखले पुराणातही सापडतात. वामन पुराणात शिव पूजेत चंदन लाकडाचा अंतर्भाव करण्यास सांगितले असून ब्रह्म वैवर्त पुराणात लक्ष्मीचे वास्तव्य चंदन वृक्षाजवळ असते असे नमूद केलेले आहे.
सुगंधित द्रव्य व लाकूड निर्यातीत भारताचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले असून, परंपरेने ५००० वर्षाहून अधिक हा वारसा पुढे चालत आलेला आहे.
चंदनाची बेसुमार तोड परंतु त्या प्रमाणात लागवडी न झाल्याने जागतिक बाजारपेठेतील मागणी भारत पुरी करण्यास असमर्थ आहे. लागवड न होण्याचे मूळ कारण म्हणजे चंदन लागवड बद्दल असलेले गैरसमज, विशेषतः दक्षिण भारतात असलेल्या सरकारी जाचक अटी.
सध्या इंडोनेशिया निर्यातीत अग्रेसर होत आहे त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया व चायना ह्या क्षेत्रात पुढे येऊ पाहत आहे. गंमतीचा भाग म्हणजे हे सर्व देश भारतीय वंशाचे चंदन वृक्ष लावून त्यांची जोपासना करून चंदन तेल व लाकडाची निर्यात करत आहेत.
आपले पूर्वज (महाराष्ट्रातील) लागवडीसाठी उदासीन होते कारण त्यांचा असा समज झाला कि दक्षिण भारतातील चंदन लागवडीच्या सरकारी / राजकीय जाचक अटी लागू त्यांनाही लागू पडतात. सध्या दक्षिण भारतात ह्या अटी बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
चंदन वृक्ष हा महाराष्ट्रातील ३३ जिल्हात आढळून आला आहे व त्याच्या बुंद्याचा घेरही बऱ्याच प्रमाणात मोठा आहे. तेव्हा मनात कोणताही किंतु न ठेवता चंदनाची शेती सुवर्ण संधी समजून केल्यास तीच तुमच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरेल.
रोपे तयार करणे
लहान रोपे अति सुर्यप्रकाशात व उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. त्यासाठी सावली व पाण्याची व्यवस्था करावी. ताजे बियाणे 2 महिन्यापर्यंत सुप्तावस्थेत असते. त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. याकरिता जर्मिनेटर 50 मिली, प्रिझम 50 मिली, 1 लि. पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्तावस्था नष्ट होऊन 1 ते 1।। महिन्यात अंकूरताना दिसतात. एरवी 3 महिन्यापर्यंत देखील अंकुरलेली दिसत नाहीत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या झाडांवरील बियांपासून रोपे तयार करताना उगवणक्षमतेत कोणताही फरक आढळून येत नाही.
पिशवीत रोपे लावणे
बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. रोपांवर दर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकवी व रोपांच्या पिशव्या अधून मधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यामध्ये रोपे 25 ते 30 सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडीयोग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियापासून साधारणपणे 2,000 रोपे तयार होतात.
लागवड
मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्ट मध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात 16’x12′ अंतरावर 1.5 x 1.5 x 1.5 फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर व कल्पतरू सेंद्रिय खत (250 ग्रॅम) ने भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते.
चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत ‘शर्विलक’ म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड 2-3 वर्षांनी मरते. पिशवीतील रोपे लागवडीपुर्वी 1 लि. जर्मिनेटर चे 100 लि. पाण्यात द्रावण तयार करून पिशवी मध्ये रोपांना 50 ते 100 मिली द्रावणाची आळवणी करावी. नंतर लागवडीच्यावेळी रोपाची प्लॅस्टिक पिशवी अलगद बाजूला काढून रोप लावावे. लागवडीनंतर त्याला पुन्हा जर्मिनेटरचे वरीलप्रमाणे ड्रेंचिंग (आळवणी) करावी.
यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा, लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते.
यजमान मध्यम आयुषी झाडे: हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, बकुळ, बारतोंडी इ.
यजमान फळझाडे: सिताफळ, रामफळ, डाळिंब आवळा, बोर.
यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.
आंतरपिक
चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान 10 फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले 4-5 वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिके घेता येतात.
जमीन
लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त, उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा 6.5 ते 8.2 असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते.
हवामान
चंदनाने झाड हे 600 ते 1,600 मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व 12 ते 45 डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते.
पाणी
चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा पाणी ठिबकने द्यावे. चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी द्यावे.
आंतरमशागत
लागवडीनंतर प्रत्येक वर्षी ऑक्टोबरमध्ये 1 मीटर व्यासाची वर्तुळाकार माती कुदळीने 15 सेमी. पर्यंत खोदून कल्पतरू सेंद्रिय खत 250 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत आवश्यकतेनुसार झाडाच्या वयाप्रमाणे तसेच सुगंधी गाभ्याची अधिक वाढ होण्यसाठी सप्तामृताच्या फवारण्या दर महिन्याला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.
चंदन शेतीतील नफा :
चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते. एका झाडात १५ ते ५० किलो इतका गाभा तयार होतो. एकरी यजमान झाडां व्यतिरिक्त २५० चंदनाच्या रोपांची व्यवस्थित लागवड होते, साधारण एका एकरात ४५०० किलो पर्यंत गाभा मिळू शकतॊ. तो गाभा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मुक्त बाजारात साधारण १४०००/- प्रति किलोने विकू शकतात. खात्रीशीर ग्राहक हवा असेल तर शेतकरी कर्नाटक राज्य सरकारला तो ६५००/- प्रति किलोने विकू शकतात. कर्नाटक राज्य सरकार म्हणजेच कर्नाटक सोप अँड डिटर्जेन्ट्स लिमिटेड कंपनी (KSDL) जी चंदन तेल, साबण उत्पादनात आणि एक्स्पोर्ट मध्ये भारतातील अग्रेसर कंपनी आहे.,
जर बऱ्याच प्रमाणात झाडे असतील तर कंपनीतील लोक स्वतः बागेत येऊन झाडे तोडून कंपनीत घेऊन जातात. जागेवर १० % रक्कम देऊन, बाकी रक्कम ६ महिन्याने म्हणजेच झाड पूर्णतः सुकल्यावर, विविध भाग वेगळे करून शेतकऱ्या समोर वजन करून परतावा देण्यात येतो.
हा वृक्षहि नारळाप्रमाणे कल्पवृक्ष आहे कारण ह्या वृक्षाच्या प्रत्येक भागाचे म्हणजेच मुळे, फांद्या, बीज, सालाचे पैसे मिळतात कारण हे सर्व भाग अगरबत्ती, पावडर, समिधा, आयुर्वेदात, सौदर्य प्रसादनात आणि लाकडी भेट वस्तू बनवण्यासाठी उपयोगी येतात.
महत्वाच्या बातम्या : –
‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’
‘हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक हे सांगणं महत्वाचं’
ट्रॅक्टर परेड रोखण्यासाठी पोलीस चक्क रस्त्यावरच बसले
बटाटा पिकावरील रोग व व्यवस्थापन