साहेब आपल्या मर्जीनं संपूर्ण देश विकू शकतो; पण शेतकरी…; काँग्रेसची केंद्रावर टीका

0

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन आठवड्यांपासून अधिक कालावधीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यामध्ये सर्वोच्च न्यायालयानंही हस्तक्षेप केला असून शेतकऱ्यांना अहिंसक आंदोलनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा सल्ला केंद्राला दिला. मात्र, तसे केल्यास शेतकरी चर्चेस तयार होणार नसल्याचे नमूद करत केंद्र सरकारने हा सल्ला अमान्य केला. दरम्यान, शेतकरी आंदोलनावरून काँग्रेसनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते भाई जगताप यांनी या मुद्द्यावरून केंद्रावर निशाणा साधला आहे. “साहेब आपल्या मर्जीनं संपूर्ण देश विकू शकतो पण शेतकरी आपल्या मर्जीनं धान्यही विकू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भाई जगताप यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.

कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा सल्ला

शेतकऱ्यांना अहिंसक आंदोलनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा सल्ला केंद्राला दिला. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन आठवडय़ांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी घेतली. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि इतरांचा मुक्त प्रवासाचा अधिकार या मुद्दय़ांनाच तूर्त प्राधान्य देत असून, कायद्यांच्या वैधतेचा मुद्दा सद्य:स्थितीत विचारात घेतलेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Leave a comment