‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, आझाद मैदानात झळकवले पोस्टर्स
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंबईतल्या आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाला भेट देणार आहे. पवार आझाद मैदानात येत असल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले दिसत आहेत . शरद पवारांनी आपलंही म्हणणं ऐकावं म्हणून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, असा मजकूर लिहिलेले पोस्टर आणि बॅनर्स आझाद मैदानात झळकवले आहेत.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण, नोकर भरती, नोकर भरतीतील नियुक्त्या आदी विविध मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात येत आहे. काल रविवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. आजही मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. याच वेळी आझाद मैदानात दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज आझाद मैदानात येऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्यांकडेही पवारांचं लक्ष वेधावं म्हणून मराठा आंदोलकांनी ‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, असा मजकूर लिहिलेले बॅनर्स आझाद मैदानात झळकवले आहेत.
मराठा आंदोलक आज दुपारी हे बॅनर्स घेऊन शेतकरी मोर्चाच्या दिशेने घोषणा देत निघाले होते. पवारांनी आपल्या मागण्यांकडेही लक्ष द्यावे या हेतूने ते शेतकरी मोर्चाकडे निघाले होते. मात्र, शेतकरी मोर्चात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना मध्येच आडवले. त्यामुळे या मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनस्थळी थांबून जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं आहे.
काल शनिवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला होता.
मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल त्यांची ताकद संपली असेल असं सरकारला वाटत असावं. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या : –
मोदींच सरकार हे विसरले आहे की प्रजा राजा आहे आणि आपण सेवक – बच्चू कडू
पूर्व विदर्भातील ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा
शेतकऱ्यांचा जत्था आझाद मैदानात दाखल, आझाद मैदानात किसान मोर्चाची भव्य सभा