सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.
सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत.
यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.
सेंद्रीय पद्धतीने शेती हरितक्रांतीपर्यंत झाली. हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र जमीन कठीण होऊ लागली. १९६० च्या काळात जमिनी लाकडी नांगराने नांगरत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नागाराने नांगरावी लागे. त्यानंतर ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली
त्यामागे लवकर शेतीची मशागत करणे व लोखंडी नांगराने जमीन नांगरली जाऊ शकत नाही. म्हणजेच रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.
महात्मा गांधी म्हणतात, “शेती हा लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे”. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होताना खर्च वाचू शकतो कारण सेंद्रिय शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करतात. त्यामुळे त्यावर खर्च अल्पशा प्रमाणात होतो. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणजेच सेंदिय शेती होय.
बहुतांश राज्ये जास्त उत्पन्न मिळावे म्हणून रसायनांचा अतिवापर करीत आहेत. परिणामे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रश्मी सांघि (संधोधन शास्त्रज्ञ, आय.आय.टी. कानपूर) यांनी सांगितले की, रासायनिक शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले आह
सेंद्रिय अन्नाच्या बाजारपेठा – युनायटेड स्टेट्स, द. युरोपियन युनियन (जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, युनायटेड किंगडम) आणि जपान या सेंद्रिय पद्धतीची शेती करून पिकविलेल्या अन्नधान्याच्या मुख्य बाजारपेठा आहेत.सेंद्रिय शेती करून उत्पादनांची निर्मिती करणारे आशियातील प्रमुख देश आहेत, चीन, युक्रेन, भारत, इंडोनेशिया आणि इस्राईल. सेंद्रिय बाजारपेठ स्थिर गतीने वाढत असताना त्यासंबधी सेंद्रिय प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) आणि नियमावली अधिकाधिक कठोर आणि अनिवार्य होत आहे.
सर्वसाधारणप्रमाणे उत्पादनाशी थेट संबध असलेल्या कोणत्याही व्यवसायाला, उदाहरणार्थ, बियाण्याचे पुरवठादार, शेतकरी, अन्न प्रक्रियादार, रिटेलर्स आणि रेस्टाॅरन्ट्सना प्रमाणपत्र मिळू शकते.
प्रत्येक देशानुसार त्यासाठी असलेल्या आवश्यतेनुसार बदल होतो आणि सर्वसाधारणतः त्यामध्ये पिकविणे, साठविणे, प्रक्रिया करणे, पॅकेजिंग करणे आणि वाहतूक करणे इत्यादी बाबतच्या उत्पादन मानकांचा समावेश असतो.
सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती होय. सिक्कीम सरकारने २०१५ पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे ध्येय ठरविले आहे.[५] सेंद्रिय शेती सध्या सुमारे ११० देशामध्ये केली जात असून तिचा हिस्सा वाढतो आहे.
सेंद्रिय शेतीची तत्त्वे
आरोग्यायचे तत्त्व – हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते.
पर्यावरणीय तत्त्व – सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी. ती जीवसृष्टीला धरून चालणारी हवी. यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.
निष्पक्षतेचे तत्त्व – सेंद्रिय शेती ही निसर्गचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजूस कलणारी नसावी, निष्परक्षतेची खात्री देणारी असावी.
संगोपनाचे तत्त्व – यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरीत्या व्हावयास हवे. परिणामी, या व पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य व कल्याण योग्य रितीने राखले जाईल..
वैशिष्ट्ये
मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी, अनैसर्गिक वस्तू, निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके, रासायनिक पदार्थ, जीएमओ इत्यादी) उपयोग न करणे.
उत्पादनात वैविध्य
शेतीवर अवलंबून असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते. पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
एकमेकाशी निगडित पद्धती
सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
सेंद्रिय शेतीमध्ये पाळीव प्राण्यांचाही उपयोग केला जातो.
सेंद्रिय खतांचे प्रकार
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.
शेणखत
गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.
कंपोस्ट खत
शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.
हिरवळीची खते
लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.
गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीिरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो. मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
गांडूळ खत
ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.
माशाचे खत
समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.
खाटीकखान्याचे खत
खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.
सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे
नत्र पुरवठा
जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कोंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.
जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते
जमिनीला ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.(एक एकरात ८ टन कुजलेले शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.) जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
स्फुरद व पालाश
सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.
जमिनीचा सामू
सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.
कर्बाचा पुरवठा
कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करुन देतात.
सेंद्रिय खतांचा परिणाम
सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.
त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
विविध टप्पे
शेतातील मातीचे संवर्धन व पोषण : रसायनांचा वापर बंद. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे. आधी घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने, बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर. पीक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे. अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
तापमान अनुकूलन : शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे, जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही.
पावसाच्या पाण्याचा व सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग : पाझर तलाव,शेत तळे तयार करणे, उताराच्या शेतीवर पायरी पद्धत.सारख्या उंचीचे बांध घालणे. सौर ऊर्जेचा वापर. जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.
नैसर्गिक साखळी, निसर्गचक्राचे पालन : जैववैविध्याची निर्मिती. कीटकनाशके न वापरणे.शेतीचे क्षेत्र, माती, हवामान यास अनुकूल असे पीक घेणे.जैविक नत्राचे स्थिरीकरण (ग्लिरिसीडिया वृक्षांची लागवड).
प्राण्यांचे एकीकरण : पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचा वापर, पशु-उत्पादन.सौर ऊर्जा, बायोगॅस इत्यादीचा वापर करणे.
स्वावलंबन : स्वतःस लागणार्ऱ्या बियाण्यांचे उत्पादन. शेणखत, गांडूळखत, द्रव खते, वनस्पती अर्क इत्यादीचे स्वतःच उत्पादन करणे.
भारतातील सेंद्रिय उत्पादनांची टक्केवारी
१ चहा २४ टक्के
२ भात २४ टक्के
३ फळे व भाजीपाला १७ टक्के
४ गहू १० टक्के
५ कापूस ८ टक्के
४ गहू १० टक्के
६ मसाले ५ टक्के
७ कॉफी ४ टक्के
८ कडधान्य ३ टक्के
९ काजू ३ टक्के
१० इतर २ टक्के
कीटकांचा प्रतिबंध
योग्य निवड
रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणे. प्रतिरोधी बियाण्यांचा वापर, जैव विविधतेचे पालन.
आलटून पालटून वेगवेगळी पिके घेणे.
सापळा पिकांचा वापर करणे
शेतकी उपाय
पक्ष्यांच्या घरट्यांची स्थापना (पक्षी खीड खाऊन टाकतात)
दिव्याचा सापळा,चिकट बश्यांचा वापर, कामगंध सापळे यांचा वापर.
जैविक उपाय
कीटकभक्षक (परजीवी) जैविकांचा वापर, यजमान कीटकांचा वापर
वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर
अनेक वनस्पती ह्या कीडनाशक असतात. यांतील कडुनिंब सर्वात प्रभावी असते. कडुनिंबाच्या अर्काचा वापर हा कीटनियंत्रणात एक महत्त्वाचा घटक आहे. या अर्काने सुमारे २०० कीटकांचा उपद्रव नियंत्रणात येतो.
दशपर्णी अर्क वापरणे.
गोमूत्र
१:२० प्रमाणात वापर केल्याने कीट नियंत्रण होते व पिकांची वाढपण नीट होते.
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८