सोलापूरमध्ये रखडलेल्या रब्बी पेरण्यांना आता पुन्हा सुरवात
सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे रखडलेल्या रब्बी पेरण्यांना आता पुन्हा सुरवात झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ८६ हजार हेक्टरपैकी ३ लाख ४७ हेक्टरवर म्हणजेच ७१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ज्वारीची २ लाख ५७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर, गव्हाच्या ३८ हजार ८०० हेक्टरपैकी १९ हजार ५७० हेक्टरवर पेरणी झाली.
यंदा ज्वारी, हरभरा क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. तर, गहू क्षेत्रात घट झाल्याचे दिसते. हरभऱ्याची ४६ हजार ७५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याशिवाय करडईची ९२२, तीळाची १४ हेक्टर, जवस १३१, सूर्यफूल ७५ हेक्टर, इतर गळीत धान्याची १५४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.रब्बी हंगामात मक्याचे जिल्ह्यात ३४ हजार २५८ हेक्टर क्षेत्र आहे. २१ हजार ९९० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सोलापूर जिल्हा रब्बीचा म्हणून ओळखला जातो. या हंगामात सर्वाधिक पेरा ज्वारीचा होत असतो. यंदा पावसामुळे पेरण्या काहीशा रखडत सुरु झाल्या. पण ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पेरण्यात व्यत्यय आला. डिसेंबर महिना उजाडला, तरी आजही गहू आणि हरभऱ्याच्या पेरण्या सुरुच आहेत.पेरण्यांचे क्षेत्र काहीसे कमी झाले असले, तरी यंदा पाऊसमान चांगले झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.