…अन्यथा पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन; किसान संघाचे नाना आखरे यांची भूमिका
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशभरातील राजकारण चांगलेच तापले असल्याचे पाहायाला मिळाते आहे. असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघाने देखील यात उडी घेतली आहे. दोन महिन्याच्या अवधीत आता दुसऱ्यांदा केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. जर खाद्य तेलांचे आयात शुल्क वाढविण्यात आले नाही तर पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत दिल्लीत येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशाराच केंद्र शासनाला देण्यात आला आहे.सणासुदीच्या कालावधीत खाद्य तेलांच्या किमती चांगल्याच वाढल्या होत्या.
केंद्र शासनातर्फे २७ नोव्हेंबर रोजी खाद्य तेलांवरील आयात शुल्क ४१ टक्क्यांवरून ३० टक्के इतके कमी करण्यात आले. यामुळे ग्राहकांना खाद्य तेल सात रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. मात्र शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्रानेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. आता शेतकऱ्यांनी ते उत्पादन घेतले असताना आयात शुल्क कमी झाल्याने बाहेरचा माल सहजपणे देशात येईल.
त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळणार, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णयाचा केंद्र शासनाने पुनर्विचार करीत आयात शुल्क ५० टक्के करावे अशी मागणी करण्यात अली आहे. जर असे झाले नाही तर पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबतच किसान संघालादेखील जुळावे लागेल, अशी भूमिका किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांनी मांडली आहे.