सुधारित पद्धतीने गूळ उत्पादन कसे करावे?

ऊसतोडणीनंतर ६ ते १२ तासांच्या आत उसाचे गाळप करावे; अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो

0

ऊसतोडणीनंतर ६ ते १२ तासांच्या आत उसाचे गाळप करावे; अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. त्यामुळे गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

  •     ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्‍स असलेल्या चरकाची निवड करावी.
  •     गुऱ्हाळासाठी चरकाची गाळप क्षमता ६५ ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत असावी. गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.
  •     उसाच्या रसात फिनॉलिक द्रव्ये असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरीत परिणाम होतो, म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा. स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणात गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरकाचा वापर करावा.
  •     द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन ‘फूड ग्रेड’चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा. मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साह्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.
  •     हौदातून स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहिलीत पुढील प्रक्रियेसाठी घ्यावा.
  •     रस उकळण्यासाठी सुधारित काहिलीचा वापर करावा. या काहिलीच्या वापरामुळे गूळ प्रक्रियेसाठी साधारणपणे १६ टक्के कमी कालावधी लागतो. इंधनामध्ये १५ टक्‍क्‍यांची बचत होते.
  •     रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वापरावे. चुलाणावरून काहील उतरण्यासाठी ‘फ्रेम- चाके- रूळ’ यांचा समावेश असलेली यांत्रिक पद्धत वापरावी.

प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

 ०२३१ – २६५१४४५ 

Leave a comment