द्राक्ष हंगाम रोगांच्या विळख्यात; उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
सततच्या पावसामुळे डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावाचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. परिणामी, माल जिरणे व गळकूजमुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे.
जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहिले.मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या बागांना याचा फटका बसला.
सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी ५१ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी पलूस, तासगाव तालुक्यांत सर्वाधिक क्षेत्र आहे. गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष पिकांवर नैसर्गिक आपत्तीच्या संकटाची मालिका सुरूच आहे. सध्या तासगाव आणि मिरज तालुक्यातील काही भागांत द्राक्ष विक्री योग्य झाली असली, तरी जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० टक्क्यांहून अधिक बागा फुलोरावस्थेत आहेत.
सप्टेंबर महिन्यापासून फळ छाटणीस प्रारंभ होतो. सततच्या पावसामुळे फळ छाटणी घेता आली नसल्याने फळ छाटणीस विलंब झाला. दरम्यान, या साऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने घड भरणे ही प्रक्रिया झाली नाही. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाचा फटका बागांना बसला असल्याने फुलोरा गळून पडला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.