शेतकरी नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा इशारा अन्यथा….
केंद्र सरकारच्या नवीन तीन शेतकरी विधेयकांवरून वातावरण तापण्याची शक्यता आहेकाही दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असून सरकारने अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. केंद्र सरकार बरोबरच्या अनेक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी आंदोलकांनी नवीन इशारा दिला आहे. सरकारने पुढाकार घेतला नाही तर शेतकरी संघटना देशभर चक्का जाम करतील असा इशारा संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकारपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली होती. परंतु या चर्चेत काहीही तोडगा न निघाल्यानंतर सिंह यांनी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन केले आहे. सरकार कायद्यात बदल करण्यासाठी तयार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. परंतु शेतकरी संघटनांनी हि मागणी धुडकावली असून रेल्वे बंद करण्याचा इशारा दिला आहे.
शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. पण यामध्ये अजूनही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. पण हा कायदा संपूर्णपणे रद्द होणार नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे आता शेतकरी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
दरम्यान, सरकारच्या वतीने केंद्रीय कृषिमंत्री अमित शहा हेदेखील मैदानात उतरले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु यामधून काहीही मार्ग निघालेला नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.
यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सीताराम येचुरी, डी राजा यांच्यासह काही नेत्यांनी राष्ट्रपतींना भेटून निवेदन दिलं. त्यानंतर केंद्र सरकारवर टीका करत हि विधेयके शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.