‘कोणी काही करू शकणार नाही, अशा भ्रमात राहू नका’
कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये, अशा शब्दात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अण्णा हजारेंनी कृषी कायद्याच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीत जागा मागितली होती, मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहून आपण माझ्याशी सूड बुद्धीनं वागत आहात का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये.
उपोषणासाठी जागा दिली नाही तर मागीलप्रमाणे जागा मिळेल तिथं उपोषण करीन, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची नववी फेरी देखील निष्फळ ठरली असून, शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या : –
दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची केली पाहणी