डाळीच्या भाववाढीला महागाईचा फटका
मुंबई : डाळींचे भाव आता गगनाला भिडण्यास सुरुवात झालेली आहे. जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये डाळीचे भाव असेच चढे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या तुरडाळीचे भाव ११० रुपये किलो इथपर्यंत पोहोचले आहेत. घाऊक बाजारात डाळीचे भाव थेट ९ हजार ५०० रुपये क्विंटल झाल्याने किरकोळ बाजारात ही मोठी वाढ झालेली आहे. यंदा चांगला पाउस झाल्याने वेळेवर मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. मात्र, जास्त पावसाने डाळ खराब झाल्याने आवकवर परिणाम झाला आहे.
केंद्र सरकारने यंदासाठी आयात परवाने आणि त्यासाठीची कार्यवाही अजूनही पूर्ण न केल्याने डाळीचा मागणी-पुरवठा बाधित झालेला आहे. अशावेळी भाव वाढत आहेत. नवीन माल आल्यावरच तुरडाळीचे भाव बेस रेटला म्हणजे ६० रुपये किलोपर्यंत येतील असे एंजल ब्रोकिंगचे अनुज गुप्ता यांना वाटत आहे.
एकूणच ऐन सणासुदीच्या काळात आता खऱ्या अर्थाने डाळीला महागाईचा तडका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे डाळ मिल मालकांची चांदी होणार आहे तर ग्राहकांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे