महाराष्ट्र म्हटले कि शेती आलीच त्यात सर्व जगाचा पोशिंदा म्हणजे बळीराजाच, भारतात बळीराजाचे महत्त्व अधिक आहेच. आपला बळीराजा रखरखत्या उन्हात, पावसात, शेतात नेहमीच झटत असतो आणि घाम गाळून काळ्या मातीत सोनं पिकवत असतो. शेतकऱ्यांचे आयुष्य शेत- शिवार, गुरे, रानांत हवेत डोलणारी सोन्यासारखी पिके यातच नेहमी रमत असते. अभाळा एवढ्या मेहनतीमध्ये त्याला त्याच्या सर्ज्या-राज्या म्हणजे बैलांची साथ. बैलांसोबत त्याला मायेची उब देणाऱ्या गायी, म्हैशीची साथ असते. जगाला अन्न पुरविण्यासाठी मदत करणाऱ्या जनावरांनाही आपण त्याच पद्धतीचा आहार दिला पाहिजे. प्राण्यांच्या आरोग्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
आता उन्हाळा ऋतू चालू झाला आहे, या काळात आपण प्राण्याच्या आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. या दिव सात कोणता आहार पशुंसाठी आवश्यक असतो याची माहिती असणे गरजे असते. प्रत्येक गुराला त्यांच्या योग्यतेनुसार आहाराची हवा असतो. गाईंना त्यांच्या शरिराच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के शुष्क पदार्थांची आवश्यकता असते. म्हैशींना त्यांच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थाची गरज असते. जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात. आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे. आहार देताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यावी, जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकात एकदम बदल करू नये.
आहार कसा द्यावा हे आपण खालील प्रमाणे पाहू
- आहारात नियमितपणा असावा.
- हिरवा चारा फुलोऱ्यात असताना द्यावा.
- आहार शुष्क तत्त्वाच्या आधारावर द्यावा. १०० किलोस २.५ ते ३.० किलो या प्रमाणात शुष्क पदार्थ द्यावेत.
- पशुआहारात २/३ भाग वैरण असावी, तर १/३ भाग आंबवण असावे.
- एकदल वर्गातील हिरवा चारा (मका, कडवळ, ओट बाजरा, नेपियर इ.) यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
- द्विदल वर्गातील चारा (लुसर्न, बरसीम, सुबाभुळ, चवळी, शेवरी) यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
- वाळलेली वैरण (कडबा, सरमाड, पेंढा, वाळलेले गवत, बगॅस, गव्हाडे काड, उसाचे वाढे) यामध्ये एकूण पचनीय पदार्थ यांचे प्रमाण अतिशय कमी असते.
- आंबवण :यामध्ये १४ ते १६ % पचनीय प्रथिनांचे प्रमाण असावे.
- जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी खनिज मिश्रण व खनिज चाटण देणे गरजेचे आहे.
- हिरवा चारा मुबलक प्रमाणात असल्यास आंबवणावर ३० टक्के खर्च कमी करता येतो.
- प्राण्यांना आहारासह स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. दिवसातून तीनवेळा पाणी पिण्यास द्यावे.
- आहाराबरोबरच जनावरांना खासकरून उत्पादनासाठी मुबलक पाणी प्यावयास देणे जरुरीचे आहे.
- जनावरांना पिण्यासाठी द्यावयाचे पाणी वासरहित, रंगहीन असावे. तसेच त्यात कोणत्याही प्रकारचे अपायकारक क्षार नसावेत. गाई/म्हशींना द्यावयाचे पिण्याचे पाणी शक्यतो ताजे व स्वच्छ असावे.
- आपल्या देशातील उष्ण हवामानामुळे जनावरांना पाणी अधिक प्रमाणात लागते. पिण्याच्या पाण्याचे हे प्रमाण जनावरांना द्यावयाच्या (१) पशुखाद्य (२) सुकी वैरण आणि (३) ओली वैरण यावर अवलंबून असते.